पुणे : राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या माध्यमातून युवकांचे राजकारणातील ध्येय, त्यांच्या मनातील विचार संवादात्मक पद्धतीने मांडण्यसाठी व आपल्या क्षमता वृद्धींगत करण्यासाठीचे एक व्यासपीठ आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, कोथरुड येथे आयोजित राष्ट्रीय आमदार संमेलनाच्या उद्धाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (दूरदृष्यप्रमाणाली), तर व्यासपीठावर लोकसभेच्या माजी अध्यक्षा पद्मभूषण सुमित्रा महाजन, विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, उत्तरप्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीश महाना, उप सभापती डॉ. नीलम गोऱ्हे, आमदार सुमीत वानखेडे, विविध राज्यातील आमदार, राजस्थान विधानसभेचे माजी अध्यक्ष सी.पी.जोशी, राष्ट्रीय विद्यार्थी संमेलनाचे संस्थापक राहूल कराड आदी उपस्थित होते.
यावेळी फडणवीस म्हणाले, राजकारणात प्रशिक्षित नागरिक सहभागी व्हावे तसेच देशाच्या लोकशाहीत गुणात्मक परिवर्तन होण्यासोबतच त्यांच्या मुल्यातही वाढ व्हावी, यादृष्टीने एमआयटी स्कुल ऑफ गर्व्हमेंटच्या माध्यमातून राष्ट्रीय आमदार संमेलन, महिला प्रतिनिधी संमेलन असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे, यामुळे लोकप्रतिनिधी तसेच शासनात विविध पदावर काम करणारे चांगले अधिकारी, कर्मचारी मिळाले आहेत. खऱ्या अर्थाने ही लोकशाहीची सेवा आहे. देशाच्या विकासाच्या कार्यात इतरांपेक्षा वेगळे काम करणाऱ्या व्यक्तीलाच लक्षात ठेवले जाते. आपले राजकारणातील स्थान, ध्येय आणि नागरिकांच्या समस्या जाणून त्या सोडविण्याकरीता नागरिक आपल्याला विधीमंडळात पाठवतात, त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही, नागरिकांच्या विश्वास सार्थ ठरविण्यासोबतच प्रेरणादायी काम होत असल्याचे कामाच्या माध्यमातून त्यांच्या मनामध्ये प्रतिबिंबीत झाले पाहिजे. भारतीय संविधानाला अनुरुप काम करण्याकरीता आपण राजकारणात आल्याची भावना डोळ्यासमोर ठेवावी.
विधीमंडळात लोकप्रतिनीधींच्या सहभागातून कायदे निर्मिती हे प्रमुख काम आहे, यामध्ये रुची वाढविली पाहिजे. समाजातील शेवटच्या घटकांला प्रतिबिंबीत करण्याकरीता सभागृहातील कामकाजात सहभागी झाले पाहिजे. नागरिकांच्या कामात आणि विधानमंडळ कामात समान न्याय दिला पाहिजे. विधीमंडळात विविध सकारात्क आयुधाचा वापर करुन नागरिकांचे प्रश्न, आशा, अपेक्षा पूर्ण करण्याकरीता प्रमाणिक प्रयत्न करावे. प्रशासनाचे लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर लक्ष असते, त्यामुळे तेदेखील आपली कार्यक्षमता व सर्वांगिण विकासाचा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्या कामात सहभागी होवून आपल्याला मदत करीत असतात.
लोकप्रतिनिधींनी बदलत्या काळानुरुप नवीन गोष्टी शिकण्याची गरज आहे. देशातील गावागावापर्यंत तंत्रज्ञान पोहचले असून यामाध्यमाद्वारे अधिकाधिक नागरिक व्यक्त होण्याबरोबरच आपल्या कामाचे मुल्यमापन करीत असतात. राजकारणातही मोठ्याप्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याने नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज आहे. तंत्रज्ञानातील बदलावर विचारमंथन करावे, असेही फडणवीस म्हणाले.
Leave a Reply