पुणे : अवघ्या १ वर्ष १० महिन्यांच्या चिमुकल्या राजवर्धिनी प्रसाद चव्हाणने महाराष्ट्रातील तीन प्रसिद्ध किल्ले – सिंहगड, शिवनेरी आणि रायगड – यशस्वीपणे सर करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या वयात अनेक मुले चालायलाही शिकत असताना, राजवर्धिनीने हे आश्चर्यकारक यश मिळवून दाखवले आहे. तिच्या या कामगिरीमुळे ती महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाची ट्रेकर म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.
राजवर्धिनीचे वडील प्रसाद विठ्ठल चव्हाण, एक अनुभवी ट्रेकर असून त्यांनी आतापर्यंत ४०० पेक्षा अधिक ट्रेकिंग पूर्ण केले आहेत. त्यांनी पुणे ते रायगड पायी जाण्याची मोहीमसुद्धा फत्ते केली आहे. लहानपणापासून गड-किल्ल्यांविषयी असलेली त्यांची आवड त्यांनी राजवर्धिनीलाही दिली. याच प्रेरणेतून राजवर्धिनीने लहान वयातच किल्ले सर करण्याचा निर्धार केला असावा.
राजवर्धिनीच्या या साहसी प्रवासाची सुरुवात सिंहगडापासून झाली. कुटुंब तिला सिंहगडावर फिरायला घेऊन गेले असताना, पायथ्याशी पोहोचताच ती कडेवरून उतरून स्वतःच किल्ला चढायला लागली. पायऱ्या चढत काही वेळातच तिने सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळाला भेट दिली. तिच्या या कामगिरीने सर्वांना आश्चर्यचकित केले. यानंतर, तिने छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, किल्ले शिवनेरी, त्याच सहजतेने सर केले. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि कुटुंबाने तिला रायगड किल्ल्यावर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. रायगडावर पोहोचल्यावर, “छत्रपती शिवाजी महाराज की जय” ही घोषणा ऐकून तीने किल्ला चढायला सुरुवात केली. किल्ला चढून महाराजांच्या समाधीवर माथा टेकवत तिने आशीर्वाद घेतले.
अवघ्या १ वर्ष १० महिन्यांच्या राजवर्धिनीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याकडून प्रेरणा घेतली, हे विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या शौर्याच्या कथा ऐकून तिला किल्ल्यांवर चढण्याची प्रेरणा मिळाली. आजच्या पिढीला स्वराज्यासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाची माहिती असणे आवश्यक आहे, आणि राजवर्धिनीसारख्या चिमुकल्यांनी घेतलेली प्रेरणा खरंच आदर्शवत आहे. तिच्या या असामान्य कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Leave a Reply