Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

‘सवाई सर्जाचा’ जयघोषात श्री क्षेत्र वीर यात्रेची सांगता

पुणे : पुरंदर तालुक्यातील श्रीक्षेत्र वीर येथे गुलालाची उधळण करत बारा दिवस सुरू असलेल्या उत्सवाची सांगता मानकरी समस्त जमदाडे परिवार यांच्या हस्ते श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या उत्सव मूर्तींना नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपन करून पारंपरिक मारामारीने ( रंगाचे शिंपण ) करण्यात आली. लाखो भाविकांच्या उपस्थितीत ‘ सवाई सर्जाचा’ जयघोष करत पालख्यां व वीस गावाच्या मानाच्या काट्यावर फुलांची उधळण करत यात्रेची सांगता झाली.

‘मारामारी’ निमित्त पहाटे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली. दुपारी धुपारती होऊन कोडीतची मानाची पालखी प्रथम देऊळवाड्यात आली त्यापाठोपाठ कनेरी, वाई, सोनवडी, भोडवेवाडी, कसबा पेठ (पुणे) या पालख्या व सोहळ्यातील वीस गावच्या वस्त्र धारण केलेल्या मानाच्या काट्या ढोल ताशा सह अबदागिरी, निशान, छत्री, दागिदार व सर्व मानकरी मंदिरात आले.

मानाच्या पालख्या व काट्यांच्या मंदिराला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर देऊळ वाड्यातील दगडी कासवावर तात्याबा बुरुंगले, दादा बुरुंगले यांची भाकणूक (भविष्यवाणी) सांगण्यात आली.या भविष्यवाणी मध्ये यावर्षी बाजरीचे पीक जोमात येणार असून मृगाचे पाणी चार खंडात पडेल, आश्लेषा मघा नक्षत्र दोन खंडात पडेल. हत्तीचे पाणी चार खंडात पडून जनतेचे समाधान होईल. उतरा,पूर्वा, तीन खंडात पडेल, चौथ्या खंडात साधारण राहील. गाई गुरे रोगराई हटली आहे, मनुष्याच्या मागे खाता पिता आटापिटा राहिल ज्याची गादी त्याला मिळणार असल्याचे भविष्यवाणीत सांगण्यात आले. भाकणूकीनंतर दुपारी दीड वाजता देवाचे मानकरी समस्त जमदाडे यांच्यामार्फत देवाला नैवेद्य दाखवून रंगाचे शिंपन करण्यात आले यावेळी फुलांची उधळण व रंगीबेरंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »