पुणे : स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगड किल्ल्यावर शिवभक्तांनी विनापरवानगी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्याचा ठपका ठेवत पुरातत्व विभागाने सतर्कता दाखविली. त्यानंतर पोलिसांनी रात्रीच्या वेळी पुतळा हटवला. याप्रकरणी प्रशासनाने शिवप्रेमींवर गुन्हे दाखल केले. हे गुन्हे मागे घ्यावेत आणि राजगड तसेच तोरणा किल्ल्यावर शिवस्मारके उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारे निवेदन वेल्हे तालुक्यातील शिवप्रेमी, युवा शेतकरी संघटना आणि विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी (दि. ३०) वेल्हे प्रशासनाला दिले आहे.
निवेदन सादर करण्यापूर्वी मार्गासनी येथे सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास शिवप्रेमी आणि युवा शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी मनसेचे तालुका अध्यक्ष दिगंबर चोरघे, युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास चोरघे, उपाध्यक्ष सचिन ढोरे, सचिव सोपान चोरघे, कातवडी गावचे माजी सरपंच शरद पिलाने, आरपीआयचे तालुकाध्यक्ष कुंदन गंगावणे, मार्गसणीचे माजी सरपंच गोपाळ इंगुळकर, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकनाथ वालगुडे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शैलेश वालगुडे, अशोक चोरघे, नीती राज कदम, सागर मोझर, चंद्रकांत मोरे, खंडू गायकवाड, कुलदीप बांदल, अण्णा रेणुसे, भगवान खुटवड, विठ्ठल वालगुडे, विशाल वालगुडे, दत्ता पानसरे, निलेश पवार, नाना शिर्के आदी शिवभक्त उपस्थित होते.
**शिवस्मारक उभारणीची मागणी**
निवेदनात म्हटले आहे की, तोरणा आणि राजगड हे किल्ले महाराष्ट्राच्या अभिमानास्पद इतिहासाचे प्रतीक असून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे टप्पे यांच्याशी निगडित आहेत. या किल्ल्यांवर शिवस्मारके उभारल्यास पर्यटनाला चालना मिळेल आणि युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, इतिहासप्रेम आणि स्वाभिमानाची भावना वाढेल. यासाठी प्रशासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी युवा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास चोरघे यांनी केली.
**शिवभक्तांवरील गुन्हे मागे घ्या**
चार दिवसांपूर्वी राजगड किल्ल्यावर शिवभक्तांनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा प्रशासनाने हटवून संबंधितांवर गुन्हे दाखल केले. याबाबत रोहिदास चोरघे म्हणाले, “संविधानिक मार्गाने राजगडावर शिवस्मारक उभारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मात्र, शिवभक्तांवरील गुन्हे तातडीने मागे घ्यावेत.”
Leave a Reply