पुणे : गेल्या अनेक वर्षांपासून आळंदी व पंचक्रोशीत विषारी साफ पकडण्यासाठी प्रसिद्ध असलेले आळंदी येथील सर्पमित्र राहुल उर्फ विकास मल्लिकार्जुन स्वामी (वय.३२) यांचा कोब्रा जातीचा नाग रेस्क्यु करत असताना सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, आळंदी देहुफाटा येथे काळे कॉलनीत कोब्रा जातीचा नाग निघाला होता. तो पकडण्यासाठी सर्पमित्र विकास याला पाचारण करण्यात आले होते. त्याने हा कोब्रा पकडून आळंदी वनविभाग हद्दीत सोडण्यासाठी गेला होता मात्र नाग सोडत असताना त्याचा दंश राहुल याला झाला.
सर्पदंश झाल्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी आळंदी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार व लस देऊन पुढील उपचारासाठी वाय. सी. एम. रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
त्याच्या पश्चात आई व बहीण असा परिवार आहे.घरातील कर्ता पुरुष हरपल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.विकासच्या कुटुंबाला शासकीय मदतीचा लाभ मिळावा अशी मागणी आळंदीकर करत आहेत. विकास स्वामी यांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर गावात हळहळ व्यक्त होत आहे. अनेक नागरिकांनी त्यांच्या कार्याची प्रशंसा करत दुःख व्यक्त केले आहे. सर्पमित्र म्हणून त्यांनी अनेक वर्षे निसर्ग साखळी संवर्धनासाठी कार्य केले होते. त्यांच्या जाण्याने गावात शोककळा पसरली आहे.
Leave a Reply