सातारा : वाई तालुक्यातील पांडवगडावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील येथील सहा जण फिरण्यासाठी आले होते. यावेळी अत्तराच्या वासाने अचानक मधमाशा खवळल्या आणि त्यांनी हजारो मधमाशानी त्यांच्यावर हल्ला चढवला. यात चार जण गंभीर जखमी झाले, तर दोघे बेशुध्दावस्थेत होते. त्यांना वाई येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. आज सकाळच्या सुमारास पांडवगडावर ही घटना घडली.
इंदापूर तालुक्यातील नृसिंहपूर येथील आल्हाद दंडवते, निखील क्षीरसागर, गाेपाळ आवटी, अमाेल दंडवते, संताेष झापे, चैतन्य देवळे हे सहा जण वाई तालुक्यातील मांढरदेवजवळ असणार्या पांडवगड येथे गिर्यारोहणासाठी आले हाेते. साेमवारी पहाटेच ते गडावर पाेहचले. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास फिरत असताना मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. माेठ्या प्रमाणावर मधमाशा खवळल्या असल्याने त्यांनी गिर्याराेहणकांवर हल्ला केला. यात चार जण गंभीर जखमी झाले, तर दोघे बेशुध्दावस्थेत होते. त्यांना तातडीने वाईच्या दवाखान्यात आणण्यात आले.
या घटनेची माहिती मिळताच शिव सह्याद्री बचाव पथकचे राजेंद्र खरात, आशुतोष शिंदे, रोहित मुंडे, सौरभ जाधव, दिशा-शिवसह्याद्री अकादमीचे विद्यार्थी, सरकारी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी गुंडेवाडी व परिसरातील तरुण खूप मोठ्या संख्येने मदतीला धावून आले. तसेच वाई पोलिसांना व वाई पंचायत समितीमधील वाई तालुका वैद्यकीय कक्षाला समजताच त्यांनी ५ रुग्णवाहिकांसह धाव घेतली.
वाई पोलिस ठाण्याचे हवालदार श्रीनिवास बिराजदार, डिबीचे विभागाचे नितीन कदम, कवठे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. दिलिप भोजने, नरेंद्र सणस, सी.बी. जाधव, अजित चव्हाण, गीता वाठारकर या वैद्यकीय टीमने तातडीने ५ किलोमीटर डोंगर चढून घटनास्थळी पोहोचले. जखमींचा शोध घेऊन त्यांच्यावर प्राथमिक उपचार सुरू करून तब्बल पाच किलोमीटर पाऊलवाटेने खाली आणण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना रुग्णवाहिकेतून वाईच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आहे.
Leave a Reply