Puneonline.info

निर्भीड निरपेक्ष….आवाज लोकशाहीचा

आरोपांच्या कचाट्यात सापडलेले धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी आजाराचे निदान, सोशल मीडियावर दिली माहिती

मुंबई : मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली होती. त्या घटनेपासून धनंजय मुंडे हे वादात सापडले आहेत. याच प्रकरणात धनंजय मुंडे यांचे ज्यांच्याशिवाय पानही हालत नाही त्या वाल्मिक कराडला अटक करण्यात आली. त्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर कृषी मंत्री असताना साहित्य खरेदीत भ्रष्टचार झाल्याचे आरोप झाले. एवढ्या सगळया घडामोडी घडत असताना धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी या गंभीर आजाराचे निदान झाले आहे.

धनंजय मुंडे यांनी या आजाराबाबत स्वतः ट्विट करत माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून मंत्री धनंजय मुंडे कॅबिनेट बैठकांना अनुपस्थित राहत आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवारांनी पक्षाच्या सगळ्या मंत्र्यांना जनता दरबार घेण्याचे आदेश दिलेले आहेत. पण धनंजय मुंडेंनी अद्याप जनता दरबार घेतलेला नाही. त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत असताना मुंडेंनी हे ट्विट केलं आहे.

त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘माझ्या दोन्ही डोळ्यांवर पंधरा दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. पद्मश्री डॉ. टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार झाली आहे. या शस्त्रक्रियेनंतर साधारण दहा दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी विशेषत: तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. मात्र त्याच दरम्यान मला Bell’s palsy नावाच्या आजाराचे निदान झाले. त्याच्यावरील उपचाराचे निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटल मधील प्रसिद्ध डॉ. अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या आजारामुळे सध्या मला सलग दोन मिनिटही व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाही. त्यामुळे सध्या एक-दोन कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आले नाही,’ अशी माहिती मुंडेंनी ट्विटमध्ये नमूद केली आहे. लवकरच मी या सर्व आजारांवर मात करून पुन्हा सक्रिय होईल, असे या ट्विमध्ये सांगण्यात आले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »